आ. अतुल भातखळकर यांची सडकून टीका
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. निवडणूक झालेल्या पाच पैकी चार राज्यांत आधीही भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. आणि सध्याच्या निवडणुकीचा निकाल पाहता आताही भाजपाच येणार असल्याचे समोर येत आहे. तर शिवसेनेला या निवडणुकीत आपले खातेही उघडता आलेले नाही. एकूणच शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाले आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सेनेवर सडकून टीका केली आहे.
शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याचा निर्धार केला होता. मात्र, आजच्या निकालात काही तासाच्या आतच शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचे दिसून आले आहे. मतमोजणीदरम्यान शिवसेनेला फक्त पाव टक्केच मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला फक्त ०.२५ टक्के मतदान झाले आहे. तर, नोटा पर्यायालाही त्यापेक्षा जास्त म्हणजेच १.२० टक्के मतदान मिळाले होते. उत्तर प्रदेशमध्येही शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. युपीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना केवळ ०.०२ टक्के मते मिळाली. तर तिथून नोटा पर्यायाला त्याहीपेक्षा जास्त म्हणजेच ०.७१ टक्के मते मिळाली होती.
शिवसेनेने युपी आणि गोव्यामध्ये प्रचार केला होता. या प्रचारामध्ये खुद्द शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभाही घेतली होती. पण बहुतेक गोव्यामध्ये प्रचारापेक्षा प्रचारकांनी फिश करी-राईसवरच जास्त लक्ष्य केलेले दिसत आहे. कारण गोव्यात प्रचारादरम्यान प्रचारकांनी खाल्लेल्या फिश करी-राईस व्यतिरिक्त यंदाही शिवसेनेच्या पदरात काही पडलेले नाही.