अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता, या प्रकरणी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली होती. या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी 25 ऑक्टोबर रोजी भेट घेत त्यांचे सांत्वन केले, सोबतच भारतीय जनता पार्टीच्या वतीने पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली. त्यानंतर अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असो तिथे कायद्याचा धाक उरलेला नाही. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना रोजच्याच झाल्या आहेत, त्यातच महिला अत्याचारावर साधी प्रतिक्रिया देखील राज्यकर्त्यांकडून दिली जात नाही. औरंगाबाद दौऱ्यावर असताना देखील मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या तोंडोळी गावातील पीडितांची साधी भेटही घेतली नाही. माझे कुटुंब माझे जबाबदारी म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री हे कुटुंब प्रमुख म्हणून संबंधित पीडितेच्या घरच्यांच्या भेटीला जातील अशी आमची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. महिलांचे संरक्षण करता येत नसेल तर शासनाने आम्हाला सांगावे की, मुली-बाळींना घरातच बसवा, असा घणाघात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला.