दिल्ली पोलीसांच्या विशेष पथकाने ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील २ दहशतवादी महाराष्ट्राचे असून त्यातला एक मुंबईचा आहे. या कारवाईनंतर राज्यात खळबळ माजली आहे. मुंबई एटीएस पथकाला या अटकेतची माहिती नव्हती का असा सवाल खुद्द गृहमंत्र्यांनी एटीएसला विचारला. याबाबत तातडीची बैठक झाल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रसार माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलताना वळसे-पाटील म्हणाले की, या अटकेवर एटीएसची नजर असून काम सुरु आहे. पोलिसांना त्यांच्या सोयीप्रमाणे काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. पोलिस सक्षमपणे हे प्रकरण हाताळतील असंही गृहमंत्री म्हणाले आहेत. भाजपने याबाबत केलेल्या टीकेलाही वळसे-पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पोलिसांना मदत केली पाहिजे टीका नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. त्याचप्रमाणे हा राजकारणाचा विषय नाही असंही ते म्हणाले.
दरम्यान दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या या ६ दहशतवाद्यांपैकी २ जण महाराष्ट्राचे होते. त्यातला एक मुंबईच्या सायनमध्ये राहणारा असून त्याला धारावीमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली सेलने ताब्यात घेतलेला आरोपी जान मोहम्मद शेख याच्या पत्नी आणि दोन मुलींना धारावी पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. जान मोहम्मद याच्याकडे शस्त्र पोहचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती,जान मोहम्मदच्या पत्नीकडे तो कुणा कुणाच्या संपर्कात होता याची माहिती घेतली जात आहे.