राज्य सरकारने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्याचे पोलीस अधिकारीच मदत करत नसल्याचे स्वतः सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले आहे. सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून परमबीर सिंह आणि शिवसेनेचं साटंलोटं असल्याचं सिद्ध होतंय, चौकशी सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
अतुल भातखळकर पुढे म्हणाले, परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर तब्बल २६१ दिवस फरार असताना सुद्धा त्यांना बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे का केली नाही? त्यांना होमगार्ड महासंचालक या पदावरून हटवण्याची कारवाई राज्य सरकारने का केली नाही? परमवीर सिंह यांच्यावर एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना शोधण्यासाठी विशेष पथक का स्थापन केले नाही? या बाबतीत केंद्र सरकार किंवा इतर राज्यांची मदत का मागितली नाही? असे सवाल उपस्थित करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
पुढे भातखळकर म्हणाले, त्या अनिल वर आरोप केले तर केले, पण आमच्या अनिल वर कोणतेही आरोप करू नको, मी तुझ्यावर कारवाई करत नाही, अशा ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असे नाटक शिवसेनेने चालविले आहे. परमवीर सिंह यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेऊन त्याची निःपक्ष चौकशी व्हावी याकरिता तपास सीबीआय कडे द्यावा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली.